Thursday, May 20, 2021

भयशून्य ध्यास तारे!

 


भयशून्य ध्यास तारे



¶¶

तरसू नकोस आता, 

बरसू नकोस आता

उजळून टाक आता, 

हे आसमंत सारे

भयशून्य ध्यास तारे : शिवनाथ तक्ते


¶¶

विझवू नकोस आता, 

भिजवू नकोस आता

उधळून दे झळाळी, 

भयशून्य ध्यास तारे


¶¶

भुलवू नकोस आता,

झुलवू नकोस आता

विसळून घे पियाली

क्षण दोन धुंद व्हा रे


¶¶

उतरू नकोस आता,

कचरू नकोस आता

उचलून घे गळ्याशी

भयकंप अंध वारे


¶¶

पढवू नकोस आता,

कढवू नकोस आता

देह-कात विस्कटूनी

कळमुक्त वावरा रे

■■■

Monday, April 5, 2021

दिवस कसे भुर्रकन उडून जातात!

 



दिवस कसे भुर्रकन उडून जातात!

स्टार प्रवाह वर रात्री ०९.०० वाजता सुरु होणारी ‘मुलगी झाली हो’ मालिका पाहत असतो.  नेहमीचेच राग, लोभ, द्वेष आणि मत्सर यांसारखे भाव जवळपास सर्वच मालिकांच्या कथानकात असतातच असतात.  तर ह्या मालिकेतील ‘विलास पाटील’ हे पात्र ‘माऊ’ ला म्हणजेच आपल्या मुलीला पाहण्यात हरखून जातं. ज्या मुलीचं त्याने तोंडही कधी पाहिलेलं नसतं आणि जिच्या नशिबात बापाचे प्रेमाचे दोन शब्दही येत नसतात अशा विलास पाटलामध्ये झालेला बदल सुखावह आणि हळवेपणा उचंबळून आणणारा आहे.  “माऊ, मला तुझं बालपण कधी  अनुभवताच न्हाई आलं!’’ असं तो म्हणतो आणि आपण खूप मागे-मागे जाऊया असं तो माऊला म्हणतो. तिचे लाड करतो. तिला फुगे, खुळखुळा आणि कुल्फी घेऊन देतो. तिची हौस पुरवितो. आणि त्यातलाच विलासच्या तोंडचा संवाद आहे, “दिवस कसे भुर्रकन उडून जातात!”

हे असं मागे जाणं टेक्निकली शक्य नाहीये. पण खरंच “दिवस कसे भुर्रकन उडून जातात!” नाही? एवढंसं पिल्लू असलेली ‘परी’ (माझी मुलगी) अवघ्या एक तासांची असताना प्रसूतीगृहात भेटायला गेल्यावर माझ्याकडे तोंडात बोटं घालून भुटूभुटू पाहत असल्याचं जाणवलं. आता परी सात वर्षांची आहे. आणि अगदी ह्याच वेळी प्रदीप निफाडकर सरांची ‘माझी मुलगी’ ही गझल आठवते. 

आठवते मज माझी आई अशीच होती

जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी

तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू

अजून मजला अल्लड दिसते माझी मुलगी

हो तर मुलगी काय पटकन डोळ्यांदेखत मोठी होते. मग आपसूकच तिचे लाड करायला, तिच्याशी बोलायला आणि तिला खूप काही बोलायला लावण्याचा आणि तिच्याकडे एकटक पाहत निव्वळ ऐकत राहण्याचा प्रकार सुरु होतो. हे क्षण हातातून निसटून जातायेत असंच वाटायला लागतं राहून राहून. तशातच सोनू निगमने गायलेलं 'अभी मुझ में कही' छळू लागतं. बाप-लेकीच्या नात्यातला एक हळवा कोपरा असतोच. आणि 'बाप' म्हणून तेच तर आयुष्यभराचं संचित असतं! जसा 'आई होणं' हा सुखद आणि समृद्ध अनुभव असतो तसाच 'बाप होणं' हाही कृतार्थतेचा असीम अनुभव आहे. 'आई' सदोदित साठवून ठेवण्याचं राखीव कुरण म्हणजे मुलगी. म्हणूनच आईचं प्रेम कावरीबावरी झालेल्या मुलीच्या डोळ्यांत शोधण्याचा नितळ सुखाचा क्षण दुसरा कुठलाच नाही. 

वडील (अगदी शेवटच्या दिवसांतही!) अत्यावस्थ असताना दवाखान्यातील नर्सने आपसूक विचारलेला प्रश्न किती बोलका होता हे नंतर लक्षात आलं. वडिलांना लघवी आणि संडासवर नियंत्रण न राहिलेल्या दिवसांत होणारा त्रास हा असह्य होता तसेच त्यांना स्वतःलाही ह्या गोष्टीची सल होतीच. आई आणि बायको नंतर केवळ मुलगीच हे सर्व करू शकते. आणि ते सर्व आपण मुलगा म्हणून तितक्या सुसह्यपणे कधीच करू शकणार नसतो. नर्सचे हे बोल अत्यंत खरे होते. शेवटच्या दिवसांत अण्णांच्या (वडिलांच्या) डोळ्यांतून अविरतपणे वाहणाऱ्या अश्रुधारा आपण थांबवू शकत नव्हतोच. मुलींच्या भेटीसाठी आसुसलेले वडिलांचे डोळे डबडबलेलेच असलेले मी पाहिले. 

रमजान मुल्ला यांची 'मुलगी म्हणजे...' ही कविताही अंतःकरणाचा तळ गाठणारी आहे.     

 मुलगी म्हणजे गुज बोलते 

    अळवावरचे पाणी ग

            सांडून जाते एक दिवस ती

       पुन्हा रित्याचे जगणे ग

आणि ही कविता मुल्ला यांच्याच आवाजात ऐकल्यावर डोळे पाणावले नाही असे होणारच नाही. बरं ही कविता अगदी तशीच (कवी सारखी) सादर करणेही मुश्किल! खुद्द मलाही दोन-तीन वेळा ही कविता सादर करताना गलबलून आलं होतं. 

बाप-मुलीचं नातं हे हळवेपणा बरोबरच प्रगल्भतेचं धूसर शिखर असतं. माझी दोन वर्षांची 'श रं न्या' ही माझ्या हालचाली न्याहळत असते. शेताकडे गरका द्यायला मी तिला सोबत घेऊन जात असतो. माझ्या मनात चालणारे विचार कदाचित तिच्याही मनात चालत असावेत असंही राहून राहून वाटतं. || जेथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती || तसेच ह्याच नोटवर लतादीदींनी गायिलेलं 'मेरा साया साथ होगा' बॅकग्राऊंडला कितीतरी वेळ चालूच राहतं. 

         २०१२-१३ च्या दरम्यान सेट-नेट साठी अभ्यास करताना चौदाव्या शतकातील एका आंग्लकवितेची नोंद मार्गारेट ड्रॅबल संपादित ऑक्सफर्ड कंपॅनिअन मध्ये आली होती. 'पर्ल' (Pearl Poem) नावाची ही १४व्या  शतकातील तब्बल १,२१२ ओळींची अष्टावयवी ओळींची (Octosyllabic lines) अनुप्रासिक (alliterative) कविता असून त्या कवितेच्या कवी बद्दल फारशी माहिती मिळत नाही. परंतु पेशन्स (patience) आणि सर ग्वाइन अँड द ग्रीन नाईट (Sir Gawain and the Green Knight) ह्या निनावी कवितांच्या समकालीन असलेली 'पर्ल' ही कविता आहे. पर्ल हे त्या कवीच्या मुलीचं नाव असून दोन वर्षांची (किंवा त्याहीपेक्षा लहान) असताना तिचे निधन होते. आणि ज्या बागेत त्या मुलीचा पार्थिव देह दफन केलेला असतो त्या बागेत हा कवी दुःखविवशतेने भटकत असतो. तेथे त्याला झोप लागते. स्वप्नात त्याला एक नदी दिसते आणि नदीपल्याड परादिस (Paradise) असून त्याला तेथे एक युवती दिसते. आणि तो तिला ओळखतो की ती आपलीच मुलगी आहे. ती युवती (म्हणजेच त्याची मुलगी) त्याच्या अतीव दुःखाबद्दल तीव्र रागाने सुनावते आणि त्याबरोबरच कृपावंत स्थिती बद्दलही सांगते. परंतु तो त्या स्वर्गातील 'सम्राज्ञी'बरोबर ह्या 'अजब' न्यायाविषयी हुज्जत घालतो, भांडतो. तिला भेटण्याच्या विचाराने तो त्या नदीत उडी घेतो आणि पोहून पैलथडीला पोहचण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यातच त्याचे स्वप्न भंगते आणि तो खडबडून जागा होतो आणि स्वतःला दिलासा देतो. ह्या 'स्वप्न' प्रसंगामुळे त्याचा ईश्वरावरील विश्वास पुनः प्रस्थापित होतो.

       हे दोन्ही-तिन्ही patches वेगवेगळे असूनही एकमेकांत गुंतलेले आणि पराकोटीचे प्रासंगिक वाटतात. बऱ्याच दिवसांपासून हे अस्फुट विचार मनात आकारशून्य आणि टोकहीनपणे तरंगत होते. पण 'मुलगी झाली हो' च्या निमित्ताने त्यांना आकार आणि टोक मिळाले!

                     दिवस कसे भुर्रकन उडून जातात...

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर,

सहायक प्राध्यापक (इंग्रजी विभाग)

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी,

श्री साईबाबा महाविद्यालय, शिर्डी.

९५९५६८७७६४

eshivprabhat@gmail.com


Saturday, March 27, 2021

पिंड!

 






पिंड!

                     कालच कल्याणकर मावशी गेल्याचं कळलं. ऐकून थोडं सुन्न आणि हळवेपण आलं. कल्याणकर मावशी. एक अजबच रसायन म्हणायला हवं. परक्या गावात आपसूक आई भेटावी अशी आईसारखी काळजी करणारयापैकी ती एक होत. जून २०१२ मध्ये फिरोदिया महाविद्यालयात (साकुर) येथे रुजू झालो. तेव्हा तिच्याकडेच मी एक मेस मेंबर म्हणून कनेक्ट झालो. माझ्याबरोबर असलेले राजेंद्र हिंगे यांचा आणि मावशीचा विशेष लोभ असल्याचे समजले. म्हातारी राजूला मुलासारखं मानायची. ती म्हणायची की “माझे दोन चीर (लेक) तसा हा एक पीर.” राजू नेहमी मावशीला आई म्हणूनच संबोधायचा. मावशीचा स्वभाव हा शैलीदारच होता. संत आसाराम बापूंवर तिची विशेष भक्ती. त्यांच्याविषयी एक अपशब्दही ती सहन करायची नाही. 

 तर हा राजू तिला लाडीगोडी लावून पळीभर भाजी, कोरभर पोळी खायला घ्यायचा. नाश्ता करायच्या टायमालाही तेच. आणि पैशाची मागणी केल्यावर तो (जोडीला आल्हाट सरही!) तिला गाणं म्हणायला सांगायचे. “मावशी तुमचा आवाज खूप छान आहे. तुम्ही एखादं छानपैकी गाणं म्हणा ना. आणि हो ते ‘देव जरी मज कधी भेटला’ हे अवश्य म्हणा.” एवढ्या बोलण्याने म्हातारी पार पघळायची. अन पैसे मागायचं विसरून जायची. मनाने तशी खूप चांगली होती मावशी. तिच्या स्वयंपाकाची तारीफ केलेली तिला खूप आवडायची. (आणि हो! पुरणपोळी तर फारच झाक बनवायची ती. मी बायकोला नेहमी तिच्या हातच्या पुरणपोळीचं उदाहरण द्यायचो. आणि त्यावरून होणारं रामायण हे वेगळंच!) एकमेकांच्या संगतीत आमचं मन खूप छान रमायचं. आल्हाट सरांना ती ‘लल्ल्हाटी सर’ म्हणायची. पण करंडे (दि पी कारंडे) चा का राग-राग करायची हे काय मला कळलंच नाही. सुभाष वडितके, मयूर पचपिंड मी, आणि दिलीप कारंडे हे मावशीकडे मेस मेंबर होतो.

 मावशीला बोलायला फार आवडायचं. सर्वांची (जरा) जास्तच आपुलकीनं चौकशी करायची. लग्न न झालेल्या स्टाफ मेम्बर्स बद्दल तिला अतिशय कणव होती. लग्न जमावं या साठी ती तर्हे-तर्हेचे उपाय (व्रत) सांगायची. मला तर तिने पाच सोमवारी महादेवाच्या पिंडीवर गहू वहायला सांगितले होते. (एका सोमवारातच मला गुण आला! लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी १३/०२/२०१४ ला कॉलेजवर आणि थेट कॅन्टीनला मावशीला भेटायला गेलो होतो.) महाविद्यालयात खेळाचे सामने असताना मी समालोचन करायचो. तेव्हा मधे-मधे चित्रपटातली गाणी लावायचो. तर काही वेळा मी मावशीला गवळणी म्हणायला लावायचो. तेव्हा न लाजता, न घाबरता ती गाणे म्हणायची.

  २६ जानेवारी २०१४ ला जेव्हा मी काही कारणांनी फिरोदिया कोलेज सोडलं. त्यावेळी तिलाही माझी जरा हळहळ वाटली. (३१/०२/२०१९ ला पुन्हा एकदा साकुर सोडलं. पण तेव्हा मला मावशीला भेटता आलं नाही!) मध्यंतरी कॉलेजमधील नामदेव पवार, विजय सोनवणे, नितीन गोर्डे, शंकर राशिनकर, दत्तात्रय आसवले, सचिन घोलप(प्राचार्य) इत्यादी प्राध्यापक मंडळी आणि आरजू शेख, आशा मुन्तोडे, मुक्ता चितळकर, मोहिनी आल्हाट व नवले म्याडम इत्यादी प्राध्यापिकांचीही मेस त्यांच्याकडे चालू होती. अधून मधून मावशीची भेट व्हायची. कधी कधी ती स्टाफ क्वार्टरला यायची. सर्वांची विचारपूस करायची. चार-पाच वर्षांपूर्वी ती जाम आजारी पडली होती. त्यामुळे तिला मेसही बंद करावी लागली होती. (आता काय म्हातारी जगत नाही असं वाटलं. पण तिनं तेव्हा आजाराला पिटाळून लावलं!) तशी आताही शेवटी शेवटी आजारी असल्यामुळं तिला मेस बंद करावी लागली होती. माझा मेसचा प्रश्न संपला होता. परंतु कोलेजात वेगवेगळ्या प्रसंगी (बहि:शाल व्याख्यानमाला वगैरे) मला तिला फोन करून डब्यांचं सांगावं लागायचं. “डब्यामध्ये गोड काय देऊ?” असं ती आवर्जून विचारायची. ती मेसच्या डब्याचे इतरांपेक्षा जास्त पैसे आकारायची. पण तेवढ्यासाठी नामदेवराव पवार तिची मेस सोडून इतरत्र जाण्याचा विचारही करत नव्हते. (त्यांना वाटायचं की तेवढाच म्हातारीला आर्थिक आधार होईल!) 

 शेवटी माणूस एकमेकांच्या आधारानेच जगत असतो. फक्त तो आधार विश्वसनीय असावा एवढीच आपली अपेक्षा असते. दोन मुलं, सुना, नातवंडे, नवरा(नाना) आदि गणगोत तिला होतंच. पण आमचीही ती अगदी जवळच्या (पोटाच्या) नात्याची होती. नाना आणि तिच्यात लुटुपुटूची भांडणं व्हायची. नानाला दुकानातून आणि बाजारातून सामान-भाजीपाला आणायला जावं लागायचं. आणि त्यांची नकार द्यायची टाप होत नव्हती. शेवटी शेवटी मावशीला भेटायला जायची इच्छा व्हायची पण वेळ मिळत नव्हता. (गोरखनाथ जाधव, शंकर राशिनकर, आणि मी (हे चोर लोक!) आमच्या तिघांच्याही बायकांना हाच प्रश्न छळायचा की “फक्त ह्यांनाच काय ती कॉलेजात कामं असतात. नेहमी कोलेजला वाहून घेतेलेले वगैरे वगैरे.) तर असो. मावशीला-कल्याणकर मावशीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तिच्या आत्म्याला चिरशांतीचे दान मागतो.

आता काय ‘ती’ महादेवाची पिंड आणि ही ‘कावळा’ शिवायची पिंड हाच काय तो संदर्भ उरलाय!  

💐💐💐 #१२/०२/२०१९

Wednesday, March 24, 2021

भयशून्य ध्यास तारे!


¶¶

तरसू नकोस आता, 

बरसू नकोस आता

उजळून टाक आता, 

हे आसमंत सारे


¶¶

विझवू नकोस आता, 

भिजवू नकोस आता

उधळून दे झळाळी, 

भयशून्य ध्यास तारे


¶¶

भुलवू नकोस आता,

झुलवू नकोस आता

विसळून घे पियाली

क्षण दोन धुंद व्हा रे


¶¶

उतरू नकोस आता,

कचरू नकोस आता

उचलून घे गळ्याशी

भयकंप अंध वारे


¶¶

पढवू नकोस आता,

कढवू नकोस आता

देह-कात विस्कटूनी

कळमुक्त वावरा रे

■■■


Monday, February 15, 2021

नानास

 #प्रा_नानासाहेब_गुंजाळ 

यांस:


एक    तुला   पाठवितो    कविता

त्या    कवितेचे   सोने    कर    तू 


तुझा   सुखी    सहवास  मिळू   दे

 एक      होऊ     दे  शब्द   तराने 


हात    तिचा    धर    घट्ट   पकडूनी

अजून   जरा   ती   अल्लड     आहे 


तार      सप्तकातून     घुमू    दे

साज  स्वरांनी     कवितेचे    घन


मध्य   आळवून     प्रदीर्घ     संयत  

फुलव   तिचे    असणे   आशयघन 


खोल   तुझ्या    खर्जात  खुलू   दे

कवि -   कवितेचे       एकाकीपण!


© *शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर*

Monday, February 1, 2021

कविता

 गाली खुदकन हसते तेव्हा

नितांत सुंदर दिसते कविता

स्वप्न पडावे भल्या पहाटे

तशी सुखावून जाते कविता


आयुष्याच्या कातरवेळी

स्वप्नांतून सावरते कविता

दुःखाने जो गहिवर येतो

त्या अश्रूंत मिसळते कविता


कड्या-कपारीतुन विलगल्या

कळपांतुनि हंबरते कविता

डोळ्यांमधुनि ओघळणाऱ्या

ताऱ्यांपरी लखलखते कविता


चिंच, आवळा अन बोरांना

आठवता आंबटते कविता

गंधित करतो जीव मोगरा

त्याहूनही मोहरते कविता


दाटून येता अभ्र अकाली

बीजलीसम लखलखते कविता

रानामधल्या मोरपिसांनी

वाऱ्यावर भिरभिरते कविता


रात रात भर जागून नंतर

पहाटता जन्मते कविता

डोळ्यांखाली अर्धवर्तुळे 

जमती तेव्हा कळते कविता 


भूलथापांना भुलते कविता?

अनुतापांना छळते कविता?

कुशल, प्रशिक्षित तरी उपेक्षित

अर्धपगारी, वेठबिगारी,

वांझ बौध्दिके झोडीत बसता,

अजिबात ना रमते कविता,

प्रश्नांना त्या भिडते कविता,

किंचित ना डगमगते कविता,

फाशीचेही दोर कापुनी

मुक्तपणाने जगते कविता.


छंद, बंध ना वृत्त-व्यंजने

त्यात अडकता घडते कविता

जीव जडावा आयुष्यावर

तशी अनामिक जुळते कविता 


हिशोब मांडून, अबीर सांडून

सुखावून धडधडते कविता

आयुष्यातील सार्थकतेने

डोळे मिटुनी सरते कविता

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर