Saturday, March 27, 2021

पिंड!

 






पिंड!

                     कालच कल्याणकर मावशी गेल्याचं कळलं. ऐकून थोडं सुन्न आणि हळवेपण आलं. कल्याणकर मावशी. एक अजबच रसायन म्हणायला हवं. परक्या गावात आपसूक आई भेटावी अशी आईसारखी काळजी करणारयापैकी ती एक होत. जून २०१२ मध्ये फिरोदिया महाविद्यालयात (साकुर) येथे रुजू झालो. तेव्हा तिच्याकडेच मी एक मेस मेंबर म्हणून कनेक्ट झालो. माझ्याबरोबर असलेले राजेंद्र हिंगे यांचा आणि मावशीचा विशेष लोभ असल्याचे समजले. म्हातारी राजूला मुलासारखं मानायची. ती म्हणायची की “माझे दोन चीर (लेक) तसा हा एक पीर.” राजू नेहमी मावशीला आई म्हणूनच संबोधायचा. मावशीचा स्वभाव हा शैलीदारच होता. संत आसाराम बापूंवर तिची विशेष भक्ती. त्यांच्याविषयी एक अपशब्दही ती सहन करायची नाही. 

 तर हा राजू तिला लाडीगोडी लावून पळीभर भाजी, कोरभर पोळी खायला घ्यायचा. नाश्ता करायच्या टायमालाही तेच. आणि पैशाची मागणी केल्यावर तो (जोडीला आल्हाट सरही!) तिला गाणं म्हणायला सांगायचे. “मावशी तुमचा आवाज खूप छान आहे. तुम्ही एखादं छानपैकी गाणं म्हणा ना. आणि हो ते ‘देव जरी मज कधी भेटला’ हे अवश्य म्हणा.” एवढ्या बोलण्याने म्हातारी पार पघळायची. अन पैसे मागायचं विसरून जायची. मनाने तशी खूप चांगली होती मावशी. तिच्या स्वयंपाकाची तारीफ केलेली तिला खूप आवडायची. (आणि हो! पुरणपोळी तर फारच झाक बनवायची ती. मी बायकोला नेहमी तिच्या हातच्या पुरणपोळीचं उदाहरण द्यायचो. आणि त्यावरून होणारं रामायण हे वेगळंच!) एकमेकांच्या संगतीत आमचं मन खूप छान रमायचं. आल्हाट सरांना ती ‘लल्ल्हाटी सर’ म्हणायची. पण करंडे (दि पी कारंडे) चा का राग-राग करायची हे काय मला कळलंच नाही. सुभाष वडितके, मयूर पचपिंड मी, आणि दिलीप कारंडे हे मावशीकडे मेस मेंबर होतो.

 मावशीला बोलायला फार आवडायचं. सर्वांची (जरा) जास्तच आपुलकीनं चौकशी करायची. लग्न न झालेल्या स्टाफ मेम्बर्स बद्दल तिला अतिशय कणव होती. लग्न जमावं या साठी ती तर्हे-तर्हेचे उपाय (व्रत) सांगायची. मला तर तिने पाच सोमवारी महादेवाच्या पिंडीवर गहू वहायला सांगितले होते. (एका सोमवारातच मला गुण आला! लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी १३/०२/२०१४ ला कॉलेजवर आणि थेट कॅन्टीनला मावशीला भेटायला गेलो होतो.) महाविद्यालयात खेळाचे सामने असताना मी समालोचन करायचो. तेव्हा मधे-मधे चित्रपटातली गाणी लावायचो. तर काही वेळा मी मावशीला गवळणी म्हणायला लावायचो. तेव्हा न लाजता, न घाबरता ती गाणे म्हणायची.

  २६ जानेवारी २०१४ ला जेव्हा मी काही कारणांनी फिरोदिया कोलेज सोडलं. त्यावेळी तिलाही माझी जरा हळहळ वाटली. (३१/०२/२०१९ ला पुन्हा एकदा साकुर सोडलं. पण तेव्हा मला मावशीला भेटता आलं नाही!) मध्यंतरी कॉलेजमधील नामदेव पवार, विजय सोनवणे, नितीन गोर्डे, शंकर राशिनकर, दत्तात्रय आसवले, सचिन घोलप(प्राचार्य) इत्यादी प्राध्यापक मंडळी आणि आरजू शेख, आशा मुन्तोडे, मुक्ता चितळकर, मोहिनी आल्हाट व नवले म्याडम इत्यादी प्राध्यापिकांचीही मेस त्यांच्याकडे चालू होती. अधून मधून मावशीची भेट व्हायची. कधी कधी ती स्टाफ क्वार्टरला यायची. सर्वांची विचारपूस करायची. चार-पाच वर्षांपूर्वी ती जाम आजारी पडली होती. त्यामुळे तिला मेसही बंद करावी लागली होती. (आता काय म्हातारी जगत नाही असं वाटलं. पण तिनं तेव्हा आजाराला पिटाळून लावलं!) तशी आताही शेवटी शेवटी आजारी असल्यामुळं तिला मेस बंद करावी लागली होती. माझा मेसचा प्रश्न संपला होता. परंतु कोलेजात वेगवेगळ्या प्रसंगी (बहि:शाल व्याख्यानमाला वगैरे) मला तिला फोन करून डब्यांचं सांगावं लागायचं. “डब्यामध्ये गोड काय देऊ?” असं ती आवर्जून विचारायची. ती मेसच्या डब्याचे इतरांपेक्षा जास्त पैसे आकारायची. पण तेवढ्यासाठी नामदेवराव पवार तिची मेस सोडून इतरत्र जाण्याचा विचारही करत नव्हते. (त्यांना वाटायचं की तेवढाच म्हातारीला आर्थिक आधार होईल!) 

 शेवटी माणूस एकमेकांच्या आधारानेच जगत असतो. फक्त तो आधार विश्वसनीय असावा एवढीच आपली अपेक्षा असते. दोन मुलं, सुना, नातवंडे, नवरा(नाना) आदि गणगोत तिला होतंच. पण आमचीही ती अगदी जवळच्या (पोटाच्या) नात्याची होती. नाना आणि तिच्यात लुटुपुटूची भांडणं व्हायची. नानाला दुकानातून आणि बाजारातून सामान-भाजीपाला आणायला जावं लागायचं. आणि त्यांची नकार द्यायची टाप होत नव्हती. शेवटी शेवटी मावशीला भेटायला जायची इच्छा व्हायची पण वेळ मिळत नव्हता. (गोरखनाथ जाधव, शंकर राशिनकर, आणि मी (हे चोर लोक!) आमच्या तिघांच्याही बायकांना हाच प्रश्न छळायचा की “फक्त ह्यांनाच काय ती कॉलेजात कामं असतात. नेहमी कोलेजला वाहून घेतेलेले वगैरे वगैरे.) तर असो. मावशीला-कल्याणकर मावशीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तिच्या आत्म्याला चिरशांतीचे दान मागतो.

आता काय ‘ती’ महादेवाची पिंड आणि ही ‘कावळा’ शिवायची पिंड हाच काय तो संदर्भ उरलाय!  

💐💐💐 #१२/०२/२०१९

Wednesday, March 24, 2021

भयशून्य ध्यास तारे!


¶¶

तरसू नकोस आता, 

बरसू नकोस आता

उजळून टाक आता, 

हे आसमंत सारे


¶¶

विझवू नकोस आता, 

भिजवू नकोस आता

उधळून दे झळाळी, 

भयशून्य ध्यास तारे


¶¶

भुलवू नकोस आता,

झुलवू नकोस आता

विसळून घे पियाली

क्षण दोन धुंद व्हा रे


¶¶

उतरू नकोस आता,

कचरू नकोस आता

उचलून घे गळ्याशी

भयकंप अंध वारे


¶¶

पढवू नकोस आता,

कढवू नकोस आता

देह-कात विस्कटूनी

कळमुक्त वावरा रे

■■■