Sunday, May 24, 2020

पंच/ शिष्टाचार प्रथा

पंच/ शिष्टाचार प्रथा 
मी दि. १८ फेब्रुवारी, २०१७ रोजी अंदरसूल ता. येवला येथे माझ्या आतेबहिणीच्या लग्नसमारंभासाठी (खासकरून देवक- देवकार्य साठी) आलो होतो. तेथे 'पंचाला येणे', पंच बोलावणे आदी रीत-परंपरा असल्याचे कळले. लिंगायत समाजात असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. कारण अशी पद्धत मालेगाव, पिंपळगाव बसवंत, नाशिकरोड ह्या ठिकाणचे अपवाद वगळता इतरत्र कोठेही असल्याचे ऐकिवात नाही. आणि म्हणूनच ह्या  वैभवशाली परंपरेबद्दल लिहावं असं मला वाटलं. 
आपल्या रूढी, प्रथा आणि त्यांचे पूर्वापार चालत आलेले आपण सर्व पाईक. हा आपला वैभवशाली भूतकाळ आपल्याला सतत  आपले भविष्य आणि भवितव्य ठरविण्यासाठी प्रेरणा देतो. प्रेरणा, जाणिवा, नेणिवा यांची मूळं आपल्या प्रदीर्घ आणि पूर्वापार चालत आलेल्या, आणि आपण निष्ठेनं चालविलेल्या प्रथा-परंपरांमध्ये आहे. पंचाला येणे ही अशीच एक पद्धत आहे. हिलाच 'शिष्टाचार' असेही म्हणतात. लग्न, मुंज, अंत्यविधी इत्यादी साठी पुरोहित्य करणारे जंगम स्वामी सदर पंचाला येण्याचं निमंत्रण देतात. रात्री निवांत (०९:००-०९:३०) च्या दरम्यान लग्नघरी जमतात. ह्या शिष्टाचारचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडलेला असतो. तसेच ज्या घरी पंच बोलावले जातात त्यांनी पंचांना 'बाब' (एक ठराविक रक्कम!) देण्याची पद्धत आहे. समाजातील लोकांना लग्नपत्रिका देण्याची पद्धत नसल्याचे मला माहित होते. तसेच लिंगायत समाजातील बहुतांश लोक हे व्यापारी असल्याने त्यांना एकत्र आणण्याची ही एक आदर्श पद्धत आहे. समजाला ही मिळणारी रक्कम(बाब) समाज हितासाठी तसेच जंगम स्वामींना दक्षिणा देण्यासाठी केला जातो. पंच आल्यानंतर त्यांना पाणी, पानसुपारी, जाहीर आवतन देणे आणि शेवटी चहा देणे हा ह्या परंपरेचा भाग आहे. पंच बोलावणे (असणे) किंवा शिष्टाचार ही एकविसाव्या शतकातील 'सहविचार सभा' च असून त्या सभेचे मूळ १२व्या शतकातील 'शिवानुभवमंटप' ह्या आदर्श आणि आद्य लोकविचार सभेतच आहे असे म्हणावे लागेल!

Wednesday, May 6, 2020

बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव! (कविता)

बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव!

आपल्या खोट्या शपथांच्या पुण्याईवर 
जगू पाहणारे आपण एकजात भ्रष्ट प्राणीच,
नाहीतर काय! शुलिभंजन, देवगिरी, भद्रामारुती,
एवढंच काय बिकावू पदव्यांच्या आणि खैरातींच्या
बळावर बळकाविलेल्या जागा किंवा तत्सम प्रलोभनं
 सुद्धा थांबवू शकलं नाही आपल्याला क्षणभर.

झेंगाटखोर वातावरणात तापदायक वाटू लागलेल्या
कुटाळक्या, चहापान आणि मेजवान्याही 
करू नाही शकल्या आपल्याला डळमळीत किंचितही.
पीएचड्यांचे पेव आणि प्रबंधांचे भाव ऐकून
थोडा सुद्धा ढळला नाही तोल
याचं अजूनही नवल वाटत नाही,
एकूण एक हाही स्वप्नरंजित अविर्भावच!

नात्यांची, खानावळींची, मारुतीला घातलेल्या खेटांची,
आणि त्यातच भविष्यबद्दलची असलेली अनास्था
लपवू शकलो नाहीच आपण!
किमान स्वतः पुरता क्रूरपणा
राखीव ठेवता येतोच ना!
त्यात आणखी मोकळं आणि हलकं 
वाटण्यासारखं काय आहे?
खोटेपणाचा रेटा हा आपल्या
जीवनशैलीत आपण मिरवलेला
आणि जिरवलेला मूर्तिमंत क्रूरपणा.

बाकी अस्तित्वासाठीची अवीट धडपड,
महानगरांकडे वळवलेलं चित्त,
विद्यापीठीय घुमजाव, पंडित चौरासीयांचं 
बसरी वादन, आनंदसागर किंवा
सपाट फळ्याकडे पाठमान करून
नसती ओढाताण आणि उष्टावळ्या 
न काढण्याची द्विरुक्ती!

या सगळ्यात 'गझलांवर' निस्सीम
 प्रेम करणारे प्राध्यापक, 
त्यांच्या तंत्रज्ञानशून्यतेवर यथेच्छ
शेरे मारणारे आपण, 
आणि नित्यनेमाने मारुतीला माथा
टेकवणारे बुजुर्ग चाचा!
आणि याच्याही कितीतरी वर
थेट चैतन्याच्या परिसीमा भेदून 
गवसणी घालणारं निवृत्तीतलं
निस्सीम ज्ञान, मूर्तिमंत कोश
आणि ऋषितुल्य विद्यापीठ!

हे सगळं खोलवर, अत्यंत अटळ
आणि दाट विस्मृतीच्या वाटेवरील 
वास्तव, की विस्तव,
कि नेहमी प्रमाणेच--
बारकावे नीटपणे न समजू शकल्याचा अविर्भाव?

©शिवनाथ अशोक तक्ते आश्वीकर,
सहायक प्राध्यापक (इंग्रजी विभाग)
जनसेवा  फौंडेशन लोणी बु संचलित 
कला व वाणिज्य महाविद्यालय, शेंडी (भंडारदरा) 
ता. अकोले, जि. अहमदनगर